मंगळवार, ४ जानेवारी, २०२२

 मातृ देवो भव!


गेल्या काही वर्षांमध्ये मला ‘आया’ हा प्रकार खूप वैशिष्ट्यपूर्ण, कुतुहलजनक आहे असं लक्षात आलं. समाजातील एकंदरीत आया किवा ‘आईपणा’ हा खूप अभ्यासाचा विषय आहे. आई बनण्याची इच्छा निर्माण झालेल्या (किंवा निर्माण केली गेलेल्या) मुलींपासून ज्या आयांच्या मुलांची मुलं आता आई-बाबा बनण्याच्या वाटेवर आहेत अशा अनेक आयांचे मी निरीक्षण केले. अजूनही करत आहे. ‘मूल’ ही ‘दैवी देणगी’ असल्याच्या भावनेपासून ‘मालमत्ता’ असल्याच्या भावनेपर्यंतचा त्यांचा प्रवास अतिशय आश्चर्यकारक आहे .

मनुष्य प्राण्याला मुळातच ‘मूर्तिपूजेची’ नैसर्गिक हौस असल्यामुळे त्यांनी ती करण्याचे वेगवेगळे मार्ग शोधले त्यातला हा एक सोयीस्कर मार्ग ! ‘मातृपूजा’. ‘आई म्हणजे दैवत’ खोलवर रुजलेल्या पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये (कठोर शब्दात ) आपला ‘भाव’ वाढवण्यासाठीचा एका स्त्रीकडील हा समाजमान्य जालीम उपाय आहे असे माझे निरीक्षण सांगते. आई होण्याची नैसर्गिक भावना, सामाजिक गरज, पती –पत्नी च्या नात्यातील शाश्वतीचा उपाय (का बंधन ?) भविष्याची तरतूद, अलिखित कर्तव्य, घराणं पुढे चालवण्याची गरज, एक नैसर्गिक चमत्काराची अनुभूति घेण्याची संधि अशी अनेक ‘गाजर’ वेगवेगळ्या मार्गांनी दाखवून तिची पद्धतशीर ‘मेंदू- धुलाई’ केली जाते. आणि अश्या प्रकारे एक आई जन्माला येते.

एक बाई आई बनते तेव्हा तिची किंमत वाढते. मग तिलाही वाटतं की आपण आता महत्वाची व्यक्ति झालो. आपल्यावर एक मोठी जबाबदारी आली . आणि ती जबाबदारी कधी शस्त्र म्हणून आपल्याच मुलांवर चालवून त्यांच्या मनात स्वत: विषयी मायमिश्रित धाक, काळजी मिश्रित आदर ही भावना खोलवर बिंबवते . हा मायेचा आणि प्रेमाचा मुलामा खोटा नक्कीच नसतो परंतु तितकासा निरागस ही नसतो असे मला पावलोपावली जाणवले आहे. त्याचच रूपांतर पुढे दुबळ्या घाबरट, परावलंबी, हटवादी, अयशस्वी मुलामुलींमध्ये होतं.

मी तुला जन्म दिला, 9 महीने पोटात वाढवले, तुला चांगले संस्कार दिले, तुझ्यासाठी खस्ता खाल्ल्या. कष्ट केले, त्याग केले, असं थेट किंवा अप्रत्यक्षपणे मुलांवर बिंबवून त्यांच्या मनात ‘मातृदेवो भव’ असा भाव निर्माण करणे हे पिढ्यानपिढ्या आणि सर्रास चालणारे षडयंत्र आहे. याला उत्तर म्हणून एखयाद्या मुलाने किंवा मुलीने “ मला जन्म द्यायला मी तुला सांगितल नव्हत.” असं उत्तर दिलं तर समस्त समाज त्याच्यावर किंवा तिच्यावर असंस्कृत असा शिक्का मारायला मागेपुढे पाहणार नाही. परंतु यात काय चुकीच आहे ? कुठल्याही आईच्या कानात किंवा स्वप्नात बाळानी येऊन, “मला जन्माला घाला. मला या जगात यायचय.’ अशी विनंती केल्याचे ऐकिवात नाही. आपण मुलांना त्यांच्या सोयीसाठी अथवा इच्छेसाठी जन्माला घालत नसून संपूर्णपणे आपल्या वैयक्तिक, कौटुंबिक, नैसर्गिक, हिशेबी इच्छेखातर जन्माला घालतो हे सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ असले तरी दुर्दैवाने ते समाजमान्य नाही.

वयाच्या 60 त पोचलेल्या ‘मुलांच्या’ आयुष्यावरचा आपला हक्क न सोडण्यासाठी स्त्रिया जी अमाप ताकद वापरतात तिची तुलना तिनेच ह्याच मुलाच्या जन्माच्या वेळेस लावलेल्या शारीरिक ताकदीशीच होऊ शकते.

लहानपणापासून मुलाला पडूच न देणे, त्याच्यावर 24 तास घारीसारखे लक्ष ठेवणे, त्याला रडू न देणे, थोडक्यात स्वत:हून काहीच न करू देणे पर्यायाने त्याच्या संपूर्ण आयुष्यात ढालीसारखे त्याच्या पुढ्यात उभे राहून सर्व वार स्वत: वर घेऊन आणि असे वागून आपण उत्तम आई बनण्यासाठी कसे झटत आहोत हे स्वत: ला आणि इतरांना अधोरेखित करून सांगणे यामुळे त्या जीवाचे माणूस म्हणून किती अपरिमित नुकसान होत आहे हे लक्षात येत नसलेल्या आया पाहून माझे हृदय तुटते .

तुम्ही त्या मुलाला जन्म दिल्यानंतर जोपर्यंत तो शारीरिक आणि मानसिक रित्या वयात येत नाही तोपर्यंत आणि केवळ तोपर्यंतच त्याला चांगलं माणूस बनण्यासाठी जीवनशिक्षण देणे हे आणि एवढेच पालकांचे काम आहे. आपल्याला त्याची ढाल बनायचे नाही त्याला स्वत:ची ढाल स्वत: बनायला शिकवायचे आहे हे जोपर्यंत लक्षात येत नाही तोपर्यंत ही मूर्तिपूजा थांबणार नाही.

माझ्या आईने मला जन्म दिला हयाबद्दल मी आनंदी आहे. तिने माझ्यासाठी केलेल्या कष्टाची आणि त्यागाची मला जाणीव आहे. परंतु माझ्यावर तिचे उपकार नाहीत हे मुलं आणि आया दोघंही समजून घेतील तेव्हा खऱ्या बदलाची सुरुवात होईल. खऱ्या निखळ नात्याची सुरुवात होईल.

आई-वडिलांना वाऱ्यावर सोडा असा या लेखाचा आशय नाही. परंतु आता आमची आयुष्य आणि तुमची आयुष्य वेगवेगळी आहेत हे समजून घेऊन दोन्ही पक्षांनी जगणे सुरू केले तर पालकांची आयुष्य आनंदी आणि तरुण पिढीची आयुष्य सोपी होतील. त्यामुळेच आई-बाबांना घरातून हाकलून देण्याचे, आई बाबांनी मुलांशी संबंध तोडण्याचे प्रमाण कमी होईल.

आपल्या मुलांचे जन्म ही आपल्या आयुष्यातील एक घटना असून आपले आयुष्य नाही. आपल्याला पालक बनायचे आहे का ? का बनायचे आहे? कधी बनायचे आहे? त्या मुलाला किंवा मुलीला कशा प्रकारचे आयुष्य देऊ करायचे आहे ? ह्याची स्पष्ट उत्तरे मिळल्याशिवाय जगराहाटी म्हणून मुलांना जन्म देण्याची चूक 21 व्या शतकात कुणीही करू नये यासाठीच हा एक प्रयत्न !

तळटीप : आई ही माणूस आहे देव नाही त्यामुळे पूजा नको प्रेम द्या !

सोमवार, १० मे, २०२१

कर लो रेहेम थोडा कर लो रेहेम


 कर लो रेहेम थोडा कर लो रेहेम


'अपेक्षा हे सर्व दु:खांचे मूळ आहे' हे लहानपणीच शिकूनसुद्धा परत परत अपेक्षा करून स्वत: चा विश्वासघात करून घेण्यात मला कसला आनंद मिळतो देव जाणे! सरदारणींच्या पाश्चात्य आणि अपंजाबी पाककलेवर विश्वास ठेवण्याची चूक मी तब्बल 2 वेळा केली आणि त्याची चांगलीच तेलकट आणि मसालेदार फळं मला भोगावी लागली. पंजाबी पदार्थात त्यांचा हात कोणी धरू शकत नसलं तरी इतर प्रांतीय पदार्थ त्या असे काही बनवतात की आपल्याला त्यांचा हात धरून ठेवावासा वाटेल!

या 2 आकस्मिक धक्क्यांनंतर सरदारणींच्या डब्यात डोकवण्यापुर्वी माझ्या डोळ्यांना आणि नाकाला अजुन धक्के मानवतील का असा सारासार विचार करूनच हे धाडस करायच्या सूचना मी मेंदूला दिल्या आहेत.

40 मुलांनी एकत्रितपणे डोकं उठवल्यावर मी शिक्षकखोलीचा आधार घेतला. हातातली डायरी भिरकावून देत मी टेबलवर डोकं ठेवलं. "मॅम, पास्ता खाओगे ?" एका सरदारणीच्या गोड बोलण्यावर मी भुलले आणि तिच्या डब्याकडे मोर्चा वळवला. भूक कडाडून लागली होती. हाच तो क्षण! मी गरमागरम इटालियन पास्त्याची प्रतिमा डोळ्यांपुढे आणत डब्यात डोकावले आणि माझ्या ह्रुदयाला आणि अपेक्षांना एकत्रितच तडे गेले. लालेलाल द्रवपदार्थ वर तरंगत होता. ते तेल आहे हे लक्षात आल्यावर कोणीतरी माझे डोळे काढून घ्यावेत अस फार तीव्रतेने मला वाटलं. मन घट्ट करत मी त्या पदार्थाचं निरीक्षण केलं. 'ये पास्ता है?' न राहवून मी शेवटी विचारलचं. तेलाच्या तलावात मला पास्ता सापडला नसावा असा विचार करत 'काय बावळट आहे ही बाई' असा अतीव क्षूद्र कटाक्ष टाकत तिने माझ्या हातात चमचा कोंबला. "अरे थोडा उपर-नीचे करो ना !" ती म्हणाली. 'उपरनीचे' केल्याशिवाय मला पास्ता सापडला नसता ह्याची खात्री एव्हाना मलाही पटली होतीच. मी धीर एकवटत त्या तलावात चमचा खुपसला. लगोलग 3-4 गरीब बिचारे बुळबुळीत 'पास्ते' गटांगळ्या खात वर आले. तेलानी माखलेल्या त्या असहाय्य नळकाड्यांची मला अतोनात दया आली. 'काश तुम्ही लोक माझ्या कढईत पडला असता.' मी सुस्कारा टाकत पास्त्यांना म्हणाले. चमचा वरखाली करताच गरम मसाल्याचा भपका माझ्या नाकात गेला. मला रडू येऊ लागलं. उग्र सरसो च्या तेलात परतलेला, दिलखुलास लसणाची फोडणी दिलेला, पनीरच्या तुकड्यांची यथेच्छ पेरणी केलेला, मसाल्यांचा पाऊस पाडलेला तो संपुर्ण पंजाबी पास्ता बघून मला भोवळ आली. त्याची चव मला प्रेमाखातर घ्यावी लागली जी शब्दात सांगणे अवघड आहे कारण माझ्या डोळ्यांना तो 'पास्ता' पटलाच नसल्याने त्यांनी मेंदूला असहकार पुकारायला भाग पाडले होते. "वो आज जल्दीमें थी ना तो फटाफटसे पास्ता बना दिया।" माझं कसनुसं तोंड बघून त्या सरदारणीने मला समजवायचा दीनवाणा प्रयत्न केला. एक तर 'जल्दीमें' पास्ता बनत नाही आणि तु जे बनवलयस त्याला पास्ता म्हणत नाहीत असं स्पष्ट उत्तर देण्यापासून मी माझ्या जीभेला पराव्रुत्त केले. काहीतरी बहाणा करून मी तिथून पसार झाले हे वेगळं सांगायला नकोच!

ही जखम ताजी असतानाच मी दुसरी करून घेतली. " मॅम, आजाओ साबूदाना खिचडी लायी है मैंने आज।' खिचडीचं नाव ऐकताच मी झालंगेलं विसरून दुसर्या सरदारणीच्या डब्याकडे धावले. मस्त खोबरं कोथिंबीर लिंबू पेरलेली, दाण्याचं कूट घातलेली, तूप-जीर्याची फोडणी दिलेली मऊमऊ खिचडी मनात आणत अर्थात! डबा उघडताच दिसली टोमॅटो कांद्याचा तडका लावलेली, मसाला मारके बनवलेली पंजाबी तेलकट खिचडी; आणि माझा जगावरचा विश्वासच उडाला!. आज उपवास है ना!" अस जरका मला ही बाई मला म्हणली असती तर पुर्ण महाराष्ट्रातर्फे मी तिची धुलाई केली असती. उपवासाच्या दिवशी मी या खिचडीचा फोटो जरी मराठी उपवासकारांना पाठवला असता तर समाजाने मला वाळीत टाकले असते हे नक्की! चवीला ही पास्त्यापेक्षा बरी असावी असं हिच्या रंगरूपावरून वाटत होतं. मला चव आठवत नाही. (आठवायची ही नाही.)

तर अश्या ह्या 2 बिकट विश्वासघातांमधून मी सहीसलामत बाहेर पडले याचा मला गर्व आहे; त्याचबरोबर 2 वेळच्या जेवणाची भ्रांत झाल्याशिवाय सरदारणींच्या अपंजाबी पाककलेकडे वळायचे नाही असा कानाला खडा लावला आहे. तेव्हापासूनच बहुतेक 'कर लो रेहेम थोडा कर लो रेहेम' हे गाणं जिव्हाळ्याचं वाटू लागलं आहे.

-संज्ञा घाटपांडे- पेंडसे

रविवार, २५ एप्रिल, २०२१

त्याग (वगैरे!)


त्याग (वगैरे!)


            मी,  मला आणि माझं या शब्दांना स्वार्थीपणाची झालर इतकी बेमालूम चिकटलेली आहे  की गरजेच्या वेळी सुद्धा हे शब्द वापरायची भीती वाटते. “सारखं मी मी माझं माझं करू नये. आपलं आहे म्हणावं, “मुलांना कशाला हवी personal space?”, “Sharing is caring". “घर म्हणलं की adjustment आलीच.  ह्या सगळ्या नैतिक शिकवण्या ऐकतच आपण मोठे होतो. आणि हळूहळू आपलं सगळं इतरांना देऊन टाकतो.  आपला वेळ, आपली शक्ति, आपल्या इच्छा, आपली स्वप्नं, आपले विचार ह्या सगळ्या अतिमहत्त्वाच्या गोष्टी आपण इतरांच्या ओंजळीत अलगद सोडून देतो आणि स्वतः पोकळ होतो. नेमक गरजेच्या वेळी ‘आपलं’ असं आपल्याकडे काही राहातच नाही आणि दुर्दैवाने तेव्हा फार उशीर झालेला असतो. आपला आपल्यावरचा मालकी हक्क आपण विसरूनच गेलेलो असतो. 


          समाजाच्या सोयीसाठी याच नाव ‘त्याग’ असं ठेवलं गेलेलं आहे. हाच तो त्याग ज्याचं उदात्तीकरण आपण सगळीकडे बघत असतो. हे त्यागाच गारूड इतक भयंकर असत की आपल सगळच कुणालातरी बहाल करण्याची घोडचुक निव्वळ आपला भोळेपणा हे दोन्ही त्यागाच्या नावाखाली अलगद लपवल जात. वस्तुतः मूर्ख बनलेलो असताना त्याला ‘त्यागमूर्ती’ हे पूजनीय नाव दिलं जातं. त्यागाची ही नशा वेळोवेळी चटके बसूनही उतरत नाही आणि आपण काही सुधरत नाही. काही गरज नसताना ‘त्याग-त्याग’ खेळून ‘त्यागमूर्ती’ बनणे हा आपल्या समाजाचा छंदच आहे. 


          त्याग ही फार मोठी, खोल आणि विचारपूर्वक केलेली कृती आहे,  पावलोपावली इतरांसाठी केलेल्या लहानसहान गोष्टीना त्याग म्हणत  नाहीत हे आपण कधी समजून घेणार? अश्या त्याग मूर्ती आपल्याला येता जाता बघायला मिळतात. “मी ‘अमुकतमुक’साठी सगळ कस सोडलं, माझ असं काहीच ठेवल नाही, हे स्वतःहून सांगणार्‍या लोकांना ‘कशाला सोडलत?, ‘कोणी सांगितल होत का? असे प्रश्न विचारणारे लोक मग निर्लज्ज दिसतात. आपण कुठल्या प्रकारचा त्याग कुणासाठी, कधी आणि कुठल्या परिस्थितीत करतो याची उत्तर आपल्या मनाला मिळाल्याशिवाय तो करण याला कदाचित वेडेपणा म्हणतात.  जे खरोखरीचा त्याग करतात ते सगळ्या जगाला त्याविषयी सांगत सुटत नाहीत कारण तो इतरांना दाखवण्यासाठी किंवा छाप पाडण्यासाठी केलेलाच नसतो. त्याग हा आपल्याला दिसतो, जाणवतो किवा जग आपल्याला त्याविषयी सांगत. ती व्यक्ति नाही जी त्याग करते.


          पिढ्यानपिढ्या चालत आलेली, आपल्याला शिकवली गेलेली प्रत्येक गोष्ट बरोबरच असते असं नसत. एखादी गोष्ट पुढच्या पिढीकडे  सोपवताना त्याची किमान चाचपणी करणं, आणि आपल्या बुद्धीला ते पटलं नाही तर त्याच आंधळ हस्तांतरण न होऊ देण फार आवश्यक आहे. कितीही नातेसंबंध निर्माण केले तरी आपण एकटे येतो आणि एकटे जातो. मग मधल्या प्रवासात ‘आपलं’ आपल्याकडे काहीच असू नये? आपल्या आयुष्यातील जितक्या गोष्टी आपल्या हातात आहेत त्याला जबाबदार फक्तं आपण असतो. आपल्या आयुष्याच्या दोरया इतरांकडे देण्यास नकार देण हा जर स्वार्थीपणा असेल तर होऊच यात आपण थोडे स्वार्थी!


(हा लेख त्याग या गोष्टीला क्षुल्लक मानणारा नाही. त्यागाच्या चुकीच्या कल्पनांवर प्रकाश टाकण्यासाठी लिहिलेला आहे.  समाजात वावरताना केलेल्या निरीक्षणांवर आधारित आहे तसेच हे माझे वैयक्तिक मत आहे . याची कृपया नोंद घ्यावी.)

मंगळवार, ९ फेब्रुवारी, २०२१

'स्लीपिंग दिवटी'

 'स्लीपिंग दिवटी'


निद्रावस्थेत माझे द्रवपदार्थात रुपांतर होते असे मला वाटते. जमीन, सतरंजी, गादी, बेड; बुडाखाली ( पोटाखाली ) काय आहे यानी मला काहीच फरक पडत नाही. मी द्रवाचेच गुणधर्म दाखवते. मी धावण्याच्या स्थितीतच झोपते. माझ्या झोपण्याच्या पद्धतीवरून मला व्यसनमुक्तीकेंद्राची गरज आहे असं कुणाला वाटल्यास मी वाईट वाटून घेणार नाही. रात्री थंडी वाजल्यावर साधं पांघरूणही मिळू नये (म्हणजे सापडू नये कारण ते पोटाखाली असत) इतकी मी असहाय होते. केसांच्या सूरनळ्या दाही दिशांना फैलावलेल्या असतात. मी स्वत: सुद्धा फैलावलेलीच असते. अख्या खोलीभर बेड बनवला तरी दुसर्या कोणालाही त्यावर झोपता येऊ नये अश्याप्रकारे आपल्या द्रवसदृश शरीराने तो संपूर्णपणे व्यापून टाकण्याचे कसब माझ्याकडे लहानपणापासूनच आहे. मला डझनभर पांघरुणे दिली तरी शेजारच्या व्यक्तीच्या पांघरुणामध्ये मला विशेष रस असतो. मी कितीही जाड झाले तरी माझ्या हाडांचा टोचकेपणा तसूभरही कमी झालेला नाही. अर्थात माझ्याबरोबरच्या व्यक्तींना आयुष्यभर माझी हाडे आणि टोमणे टोचत राहणार याची त्यांना कल्पना असतेच! कुंभकर्णाची माझ्यावर विशेष माया आहे असं मला वाटतं. माझ्याच बोजड देहाखाली सुमारे ६ तास सलग दाबला गेल्यानी व त्यामुळे त्याला पुरेसा रक्तपुरवठा न झाल्यानी माझ्या हाताचा पंजा निकामी होता होता बर्याच वेळा वाचला आहे. सकाळी त्यावर माझ्या क्रूर थपडांचा वर्षाव झाल्यानी तसा तो नेहेमी शुद्धीवर येतोच.

जाहिरातींमध्ये, चित्रपटांमध्ये सुंदर, सरळसोट, व्यवथित झोपलेले लोकं (विशेष करून नायिका) दाखवण्याचा धादांत खोटारडेपणा का केला जातो? हा संशोधनाचा विषय आहे. (का सामान्य लोकं खरच तसे झोपतात?) डोकं चालत नसलेल्या अवस्थेतही सुन्दर दिसणं या बायका कश्या जमवतात माहित नाही. आम्हाला तर जागेपणीही जमलेलं नाही. मरणाची झोप आल्यावर कुठलाही प्राणी (मी तरी) आपण नीट झोपत आहोत का असा विचार करत असेल असं मला तरी वाटत नाही. मला झोप आल्यावर (जी मला सारखीच आणि बरीच येते) मला नजरेसमोर फक्त आणि फक्त बेडच दिसतो. बाकी सगळ्या गोष्टी आपोआपच धूसर दिसतात. म्हणजे तशी मी माझ्या मेंदूची जोडणीच करून ठेवलेली आहे. पुरेशी झोप मिळवण्यासाठी मी कुठल्याही थराला जाऊ शकते. माणसाच्या अन्न, वस्त्र , निवारा या किमान गरजांमध्ये झोपेला जागा नं मिळण यासारखी दुर्दैवी गोष्ट दुसरी नाही. झोपेची किंमत ती येऊ न लागल्यावरच कळते. झोप या क्रियेमुळे शरीराला आणि मनाला जो ताजेपणा आणि पवित्रता येते त्याला तोड नाही. झोप ही जगातील सर्वाधिक सुंदर आणि आवश्यक गोष्ट आहे. माझे एक चतुर्थांश आयुष्य व्यापणाऱ्या या एकमेवाद्वितीय क्रियेला माझा कडक सलाम आणि खूप खूप प्रेम!

संंज्ञा घाटपांंडे - पेंंडसे



आर्टिस्टांची लक्षणं

 आर्टिस्टांची लक्षणं


हे ‘चेतावणीपत्र’ त्यांच्यासाठी आहे ज्यांचा शारीरिक, मानसिक, बौद्धिक, व्यावसायिक अश्या कुठल्याही प्रकारे ‘आर्टिस्ट’ या जमातीशी संबंध येतो. या लोकांशी व्यवहार करणं हे अत्यंत धोक्याचं, जिकिरीच आणि नाजूक काम आहे. ‘आर्टिस्टांपासून सावध रहा’ अशी पाटी घरासाठी बनवून घेता आली तर उत्तम. ज्यामुळे त्यांचा लहरीपणा, आगाऊपणा, माणुसघाणेपणा, विक्षिप्तपणा, विसराळूपणा, यांचे खापर तुमच्या माथी फुटणार नाही.
आर्टिस्ट्स बरोबर एकाच घरात राहायचे असेल तर शांत राहण्याची आणि सोडून देण्याची कला तुम्हाला अवगत असायलाच हवी. मुख्य म्हणजे ‘ते या जगात नसतात त्याचं वेगळं जग ते निर्माण करतात’ हे सत्य तुम्हाला पचवायला हवं.

गबाळग्रंथ, एक-दुसर्याचा दुरान्वयही संबंध नसणारे कपडे घालून, केस वगैरे न विंचरता, घरगुती चपला घालून बाहेर पडताना, ‘आरशात तरी बघितलयस का?’ असे चिथावणीखोर उद्गार काढायचा वेडेपणा अजिबात करू नये. ‘आर्टिस्ट’ हा जन्मजात आळशी असतो. स्वत:चे अढळपद सोडून, बुड हलवून तो घराबाहेर जात आहे, हीच मुळात किती स्तुस्त्य गोष्ट आहे हे सामान्य माणसांना समजणार नाही. मग नंतर, “मी माझ्या कामाला चाल्लोय. इतरांना नेत्रसुख द्यायला नाही.” अश्या प्रकारची उत्तरे मिळाल्यास समस्त आर्टिस्ट जमातीवर निर्लज्जपणाचा ठपका ठेवणे अत्यंत अन्यायकारक आहे.

कलाकाराला कला ‘होत’ असताना मध्ये मध्ये बोटं लावायला जाऊ नये. ती एक खूप क्लिष्ट आणि लांबलचक प्रक्रिया आहे. ती आपल्या गतीने आणि लहरीने होते. कलेची ‘डिलिव्हरी’ नेहेमी नॉर्मलच होते. कलेचं कधी ‘सिझेरिअन’ करता येत नाही. त्यामुळे “पटकन सुचव नं! किती वेळ!” असे खोचक टोमणे शेजारी उभं राहून मारू नयेत.

कलाकाराला काहीतरी मोठं, अद्वितीय, भन्नाट सुचत असताना, “जेवलीस का?”, “अंघोळ केलीस का?” वगैरे असे क्षुद्र प्रश्न विचारून त्यांचा समाधी भंग करू नये. एखाद्या सुंदर कल्पनपुढे शिळं, गार, कमी, नावडीचं जेवण कलाकाराच्या लेखी काहीच नसत. मुळातच जेवण, झोप, अंघोळ, दिवस-रात्र कलेपुढे हे सगळं शुल्लक असत. (कलाकारापुढे असं म्हणणं जास्त योग्य ठरेल कारण त्याची इच्छा असताना साग्रसंगीत जेवण, १२-१५ तास सलग झोप, हे सगळं कसं मिळवायचं हे त्यांना ठाउक असतं.)

चित्रकार कलेत बुडालेला असताना, खास करून रंग, पाणी घेऊन बसलेला असताना, त्याच्यापुढे चहा-कॉफी चे कप ठेवण्याचा प्रेमळपणा करू नये. असे केल्यास चहाच्या कपात रंगाचा ब्रश बुडालाच म्हणून समजा. संपूर्ण कारकिर्दीत एकदा तरी हा खूळचटपणा केल्याशिवाय कलाकार ‘कलाकार’ म्हणला जाऊ शकत नाही. तसा नियमच आहे.

‘चित्र काढून पैसे कसे कमावणार?’ एवढ्याश्या पैशात संसार चालणार आहे का?’ वगैरे चिल्लर प्रश्न विचारायच्या आधी, “ए, माझं पोर्ट्रेट काढून दे नं भारीतलं.”, “ए ही एक आकृती काढून दे नं इथे शेजारी”, “अरे हे खूप सोपं आहे. हे बघ. इथे हॅपी बड्डे लिही, इथे केक टाक की झालं ग्रीटिंग तयार.”, “काय यार! याचे पण पैसे घेणार का तू माझ्याकडून आता?” असं म्हणणारे आपणच तर पहिले नव्हतो नं? हे एकदा जरूर तपासून पहावं. कलाकाराचा उजवा मेंदू अजिबातच चालत नाही असं नसतं. आपल्यापुरते पैसे कमावणे, किवा आहे त्या पैशात मजेत राहणे यापैकी एक गोष्ट प्रत्येक कलाकाराला नक्कीच जमते.

कलाकारी हा अत्यंत खर्चिक प्रकार आहे. त्याला कोणीच काही करू शकत नाही. “मागच्याच आठवड्यात तर नवीन रंग आणले होते, त्याचं काय झालं?” असे प्रश्न विचारल्यास रागीट कटाक्षांशिवाय दुसरं काही मिळण्याची अपेक्षा ठेवू नये. चित्रविचित्र शौक पाळण्यापेक्षा रंगांवर खर्च होणे कधीही उत्तम!

तुम्ही ‘आर्टिस्ट’ बरोबर राहणारे ‘नॉन-आर्टिस्ट’ असाल तर, ‘मॅजेंटा’ कलरची बॉर्डर वाला ‘व्हर्मिलियन’ कलरचा कुरता बरोब्बर शोधून काढणं, किवा ‘वॅनडाईक ब्राऊन’ कलरच्या कपाटातून ‘कोबाल्ट ब्लू’ कलरचा शर्ट शोधणं तुम्हाला शिकून घ्यावं लागेल. तुम्हाला रंग कळत नसतील तर शेंबडा कलर, शी कलर, सिमेंट कलर, आमसूल कलर, चटणी कलर, याच भाषेत तुम्हाला रंगसंगती समजावली जाईल.

गणित न येणं हे खर्या कलाकाराच प्रमुख लक्षण आहे. आकडेवारी बोटं मोजत करणं, १८+२२ साठी लगेच कॅलक्युलेटर’ शोधण, बँकेचे व्यवहार, इंशुरन्स, पोलिसीज वगैरे विषय आयुष्यात आल्यावर आकाशात बघणं हे कलाकाराचे मुलभूत गुण आहेत. आता कलाकाराला अशी दैवी देणगी मिळाल्यावर घरातल्या इतर लोकांना त्याच्या या अश्या लहान-सहान गोष्टी निस्तरणं क्रमप्राप्तच आहे.
आर्टिस्ट तुमच्याकडे बघत असेल तरी त्याला तुम्ही दिसत असालच असं नाही. दिसणं, आणि दिसलेलं नोंदलं जाणं यातला फरक आर्टिस्ट तुम्हाला हळूहळू शिकवेल, दुधाकडे बघत असतानाही दुध उतू जाणं, एखाद्याला विचित्र वाटेल इतपत टक लावून त्याच्याकडे बघणं किवा एखादा बोलत असताना त्याच्याकडे ढुंकूनही न बघणं हा आगाऊपणा नसून अत्युच्च सृजनशीलतेचं लक्षण आहे. आर्टिस्ट ना कधीही, कुठेही, काहीही सुचत असू शकतं, आणि दुर्दैवानी ‘मल्टीटास्कींग’ त्यांना जमत नाही. त्यामुळे विचार करताना ते फक्त विचारच करू शकतात. १-२ तास नुसतं बसणं, अगदी काहीही न करता याकडे इतरांनी रागानी नाही तर पवित्रपणे पाहायला शिकलं पाहिजे.

त्याचप्रमाणे, मधूनच अचानक ‘अरेरे’!, ‘शी’, ‘वाह!’ असे उद्गार ऐकू आल्यास, काहीही कारण नसताना, गडगडाटासारखे हास्य ऐकु आल्यास, अचानक डोळे डबडबलेले दिसल्यास घाबरून जाऊ नये, ही वेडेपणाची किवा प्रेमाची लक्षणे नसून ‘आर्टिस्टपणाची’ लक्षणेही असू शकतात. इतके भावनाप्रधान विचार असल्याशिवाय आतून एखादी कला बाहेर पडणं निव्वळ अशक्य आहे.

विसराळूपणा आणि आर्टिस्ट यांचा घनिष्ट संबंध असतो. ‘आपण एखाद्या खोलीत का आलो?’ हे विसरणे, अंघोळीची सर्व तयारी करून अंघोळीला जायचं विसरणे, सकाळी काय खाल्लं हे प्रयत्न करूनही न आठवणे, कुकरला लावलेला भात विसरल्यामुळे जळून जाणे या फार सामान्य घटना आहेत. त्यासाठी दवाखाना गाठायची गरज नाही. याच आर्टिस्ट ना अचानकपणे १० वर्षापूर्वी कोणी कोणाला काय बोललं होतं?, एखाद्या २० वर्षापूर्वीच्या बारशात कुणी कुठल्या रंगाचा झब्बा घातला होता हे अचूक आठवतं. याचाच अर्थ डोक्यात काही बिघाड नसतो. फक्त सामान्य माणसाकडे आठवणीचे पद्धतशीर कप्पे असले तर आर्टिस्टच्या डोक्यात पसारा असतो त्यामुळे त्याच्या मेंदूला एवढ्या अवाढव्य दस्तऐवजांमधून एखादी ठराविक गोष्ट शोधायला जर जास्त वेळ लागतो इतकच.

‘शौचालय’ हे आर्टिस्टचं दुसर घर असतं. आतमध्ये जर तो बराच वेळ काढत असेल तर याला सर्वस्वी जबाबदार तुम्ही असता. कारण बाहेर हवा तेवढा शांतपणा न मिळाल्यामुळेच त्याच्यावर आत बसून विचार पूर्ण करण्याची वेळ येते. अर्थात आतमधल्या बैठकीइतकी फलदायी बैठक दुसरी नसते. तिथे बसून सुचणाऱ्या कल्पना उच्च दर्जाच्या असतात. त्यामुळे बाहेरून. “किती वेळ लागणारे? झोपला आहेस का आतमध्ये?” अशी आगपाखड करण्यापेक्षा आर्टिस्ट आत शिरायच्या आत आपले कार्यक्रम उरकून घेणे सोयीस्कर!

एखाद्या मुरलेल्या आर्टिस्ट बरोबर कौटुंबिक समारंभांना जायची वेळ आल्यास एखादा हातरुमाल अथवा तत्सम गोष्ट नक्की बरोबर घ्यावी. आपल्याला तोंड झाकायला उपयोगी पडते. कारण, “काय चरबी ओसंडतीए या बाईची”, “किती ‘मिस-प्रपोरशनेट’ माणूस आहे नाही!”, “अहो तुम्हाला लाईट कलर सुट नाही होणार. तुमचा स्किन टोन डार्क आहे ना.” अशी कुठलीही विधान हे लोक खुलेआम करू शकतात. तेव्हा त्यांच्या बरोबर तुम्हालाही उद्धट, मवाली, लफंगे या वर्गात गणलं जाऊ शकतं.

एकंदरीतच आर्टिस्ट जमातीबरोबर राहणं काही लोकांना काळ्या पाण्याच्या शिक्षेसमान वाटू शकतं; परंतु ही जमात नष्ट झाल्यास संपूर्ण मानवजातीचे आयुष्य सर्व अर्थाने निरर्थक होईल हे नक्की. आयुष्य प्रत्येकालाच मिळतं पण ते सुंदर बनवायचं काम हे लोकं करत असतात त्यामुळे ‘सेहे लेंगे थोडा’ असा विचार करून तुमच्या आयुष्यातल्या अश्या वेडगळ ‘आर्टिस्ट’ला जपून ठेवा.

©संज्ञा घाटपांडे-पेंडसे


शिव्या

शिव्या


 शिव्या हा जगातल्या सगळ्या भाषांमधल्या वांङमयातला एक अद्भुत ‘मास्टरपीस’ आहे.


शिव्या वाक्याची सुरुवात आहे; वाक्याचा शेवट आहे.

मैत्रीची सुरुवात आहे; मैत्रीचा शेवट आहे.

शिव्या ही मुळात एक भावना आहे. त्याला व्याकरणात काही महत्व नसलं तरी मानवी आयुष्यात खूप महत्व आहे. चार-पाच अर्वाच्च शिव्या ऐकल्याशिवाय आपल्या डोक्यात उजेड पडत नाही आणि ४-५ कचकचीत शिव्या दिल्याशिवाय इतरांच्या डोक्यात उजेड पडत नाही. वेगवेगळ्या नात्यांना, स्वभावांना आणि अवयवांना शिव्यांनी आपल्यात सामावून घेतले आहे. तसेच चू, भ, म या अक्षरांना एक वेगळेच वलय निर्माण करून दिले आहे. सुसंस्कारांची ‘पुटं’ एका फटक्यात उचकटण्याची ताकद शिव्यांमध्ये आहे. एका शिवीवर हजर होणारी मित्रमंडळी तुम्हाला मिळाली असतील तर तुम्ही नशीबवान.
लहान मुलांना शिव्या ऐकायची परवानगी नसते. त्यांच्यासाठी चांदण्या, टिंब, किवा बीप यांची सोय केलेली आहे.

आपल्या मेंदूला आग लागल्यास शिव्या फायरब्रिगेडच काम देखील करतात. राग आल्यावर चारपाच शिव्या हासडणे आणि उन्हाळ्यात तहान लागल्यावर माठातलं गार पाणी पिणे ह्य्यामुळे सारख्याच प्रकारची शांतता आणि समाधान मिळतं. शिव्या हे एक वरदान आहे. एक समाधान आहे. शिव्या या कुणी शिकवत नाही. त्या आपापल्याच शिकाव्या लागतात. त्यांचा वाक्यात उपयोगही आपला आपल्यालाच करावा लागतो. त्यामुळे त्या शिका. त्या वापरा आणि मोकळे व्हा! कारण, शास्त्र असतं ते!
-संज्ञा घाटपांडे–पेंडसे



पाळी

पाळी

 डिस्क्लेमर

माझ्या या लेखाला मी स्वतः च 'A' सरटिफिकेट देते. त्यामुळे ज्यांचे 'मानसिक' वय १८ च्या अलीकडे आहे किवा 'पाळी' शब्द ऐकल्यावर जे कान, नाक, डोळे मिटून घेणारी माकडे बनतात त्यांनी व्यक्त केलेली नाराजी ग्राह्य धरली जाणार नाही.

पाळी
एक, दोन किंवा जास्तीत जास्त ३ वेळा नवनिर्मितीचा आनंद घेण्याच्या बदल्यात दर महिन्याचा हा हकनाक रक्तपात म्हणजे निसर्गाने केलेला भ्रष्टाचार नाही तर अजुन काय आहे?
वयाच्या १३ - १४ वर्षापासून ते ४५-५० वर्षापर्यंत ही 'मासिक पाळी' वेताळासारखी समस्त स्त्री जातीच्या मानगुटीवर बसून राहते. निसर्गाच्या या अजब, अतार्किक हिशोबची उकल मला आजतागायत झालेली नाही. विज्ञान इतके प्रगत होऊनही निसर्गाची ही घोडचूक सुधारण्यासाठी कुठलाही खात्रीशीर आणि सुरक्षित उपाय मानवजातीला सापडलेला नाही हे विशेष खेदजनक आहे.
जी मुलगी स्वतः अजुन बाल्यावस्थेत आहे तिला नवनिर्मितीची देणगी देऊन फायदा काय ? तसेच जी बाई स्वतः च्या नातवंडांच्या आगमनाची वाट पहात आहे तिच्याकडे ही शक्ती शाबूत ठेवून तरी फायदा काय ?
याचा काहीच ताळमेळ बसत नाही. गणित काही फक्त माझेच कच्चे नाही. थोडक्यात चुका कुणालाच चुकलेल्या नाहीत.

दर महिन्याला या सर्वाधिक नावडत्या गोष्टीची वाट बघावी लागणे या वाक्यातच किती विरोधाभास आहे!
पाळी आली तरी कटकट नाही तरी कटकट. तारखांबरोबरचा हा खो-खो सर्वच स्त्रीयांना अटळ आहे.

सण - समारंभ हिला विशेष आवडतात. काहीही करून तारखा जुळवून आणणे यामध्ये तिला एक प्रकारचा आसुरी आनंद मिळत असला पाहिजे. तसेच प्रवासात अनपेक्षित रित्या अवतरणे हा तिचा छंद आहे. हिच्या लहरी सांभाळणे हे स्त्रियांचे अनैच्छिक कर्तव्य आहे.

पाळी शांतपणे येते आणि जाते असे असते तरी सुसह्य झाले असते परंतु तसे होत नाही. येताना ती पोटदुखी, कंबरदुखी, राग, चिडचिड, कंटाळा नैराश्य असा गोतावळा बरोबर घेऊनच येते. या काळात या सर्वांना सोबत घेऊन चेहऱ्यावर हसू ठेवून नेहमीची दिनचर्या पार पाडणे म्हणजे तारेवरची कसरत असते.

तारखा जवळ आल्या की हृदयाचे ठोके वाढतात. आपण कुठे, काय करत असताना गळती सुरू होईल याचा काही नेम नसतो. जय्यत तयारी केलेली असताना न येणे आणि कल्पनाही केलेली नसताना येणे हाही तिचा छंद आहे. आपली झालेली पंचाईत बघून तिला समाधान मिळत असावं.

समस्त स्त्रीलिंगी व्यक्तिंप्रमाणे हिलाही हिच्यावर पैसे उधळलेले आवडतात. तिला शोषून घेण्यासाठी दर महिन्याला खर्च केलेल्या प‌ॅडस्, टॅंपॉन्स अथवा तत्सम गोष्टींची बचत करता आली असती तर आज मी अति- श्रीमंत वर्गात गणले गेले असते.

घरोघरी बघितल्या जाणाऱ्या मालिका अथवा सिनेमांमध्ये, "मी तुला ९ महिने पोटात वाढवले इ. इ."महा गुळगुळीत, रटाळ डायलॉग ऐवजी, "मी तुझ्यासाठी ३० वर्ष पाळी सहन केली."हा डायलॉग लिहीण्याची हिम्मत एखाद्या तरी सृजनशील लेखकाने दाखवली तर तो अधिक ह्र्दयांना स्पर्शून जाईल.

एरवी आम्ही सामान्य महिला पाळीच्या नावाने बोटे मोडत असताना, 'पाळी ही कशी सुंदर गोष्ट आहे, आपल्याला निसर्गाने किती मोठी शक्ती दिली आहे, पाळी कडे बघण्याचा दृष्टिकोन कसा बदलायला हवा.' वगैरे खुळचट, कुचकामी विचार मांडणारा एक अविश्वसनीय, फुटीरवादी गट आमचे मतपरिवर्तन करण्याचा क्षीण प्रयत्न करत असतो. या गटाकडे आम्हा सर्व पीडित महिलांची गर्भाशयं सांभाळायला द्यायला हवीत. पोट धरून, वाहणाऱ्या रक्ताकडे बघताना, 'पाळी ही एक सुंदर गोष्ट आहे.' असा संदेश माझा मेंदू तरी मला कदापि देणार नाही. रक्ताचा एक एक थेंब असा वाया जाताना बघून मनाला यातना होतात. यासाठी माझ्या दातांनी किती अन्न चावले असेल, माझ्या पचनसंस्थेने किती अन्न पचवले असेल याला गणतीच नाही. शक्तीचा आणि रक्ताचा किती हा अपव्यय!

निसर्ग एवढाच जादुई असता तर त्याने थोडी दयाबुध्दी दाखवून आम्हाला 'प्रजनना' ऐवजी 'दुभाजना' ची शक्ती द्यायला हवी होती. अत्यल्प पुनरुत्पादन साठी ३० वर्ष ही मासिक आणि मानसिक छळ छावणी सहन करणे हा कुठला न्याय? एका हाताने वरदान आणि दुसऱ्या हाताने शाप याला काय अर्थ आहे ?

सुरुवातीच्या काळात पाळी बद्दल वाटणाऱ्या लाजेची जागा आता निर्लज्जपणानी घेतली आहे. 'मला बरं नाही.' वगैरे थोतांड सांगण्यापेक्षा आता मी सरळ 'माझी पाळी चालू आहे मी येणार नाही.' असे सांगू शकते. जे स्त्रियांना सहन करावं लागत ते जगाला ऐकून घ्यावं च लागेल.

डोळे गच्च मिटून, सर्व शक्ती एकवटून, या अग्निपरीक्षेतून पार होताना, आज पूजेला येणार नसशील ना? असल्या फाजील, अंधश्रद्धाळू, भोचक शंका घेऊन अनेक स्त्रीशत्रू आमच्या भोवती उभे राहून आगीत तेल ओतण्याचे काम मनोभावे करत असतात. त्यांच्याशी त्वेषाने लढायचे मी आता सोडून दिले आहे. एक छद्मी हास्य फेकून नटून थटून मी पूजेला हजर होते हेच त्यांना चोख उत्तर! असलाच जर देव तर त्यानेच निर्माण केलेली गोष्ट त्याला चालवून घ्यावीच लागेल की!

पाळी ही निव्वळ कटकट आहे. त्या सुमारास आमच्या भोवती एक धोकाप्रवण वलय तयार होते. त्यात आजूबाजूची मंडळी आल्यास आणि आमच्या परिस्थितीजन्य आगडोंबाची शिकार झाल्यास निसर्गाला काय ते बोलावे कारण पाळी ही जर निसर्गाची किमया असेल तर आमचा लहरीपणा ही सुद्धा निसर्गाचीच किमया आहे.

या संवेदनशील काळात पुरुष वर्गाने आम्हा आजूबाजूच्या स्त्रियांना निमूटपणे जपणे हे त्यांचे कर्तव्यच आहे. पाळी आहे म्हणून तुम्ही आहात, याची पदोपदी जाणीव ठेवून या दिव्यातून पार होण्यास जमेल तसा आधार देण्याची आता पुरुषांची पाळी आहे.

- संज्ञा घाटपांडे पेंडसे